आ.माणिकराव कोकाटे प्रकरण : सत्य, मिथ्य आणि तथ्य
आ.माणिकराव कोकाटे प्रकरण : सत्य, मिथ्य आणि तथ्य
आ.माणिकराव कोकाटे यांच्याशी संबंधित न्यायालयीन प्रकरणाने केवळ एका राजकीय नेत्यावर प्रश्नचिन्ह उभे केलेले नाही, तर संपूर्ण भारतीय न्यायव्यवस्था, प्रशासकीय यंत्रणा आणि गरीब कल्याण योजनांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हा लेख कोणत्याही व्यक्तीचे समर्थन किंवा चारित्र्यहनन करण्यासाठी नाही. हा लेख एका प्रकरणाच्या निमित्ताने उघड झालेल्या व्यवस्थात्मक अपयशाचा आरसा आहे. खरोखर जर या न्यायाने सर्वच राजकीय पुढार्यांचे पोलखोल केले गेले तर सर्वच तुरुंगात जाऊ शकतात कारण राजकारणात जाणारा कोणीच आता धुतला तांदूळ राहिलेला नाही हे कटू वास्तव आहे. खरंतर स्वातंत्र्यपूर्व काळात राजकारण हे निःस्वार्थ भावनेने देशाच्या व समाजाच्या सेवेसाठी केले जात होते.पण आता राजकारणात माणसे संपत्ती, सत्ता, पद आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठीच/ वाढवण्यासाठीच जातात, देशसेवेसाठी नाही. या नियमाला अपवाद मिळणे देखील दुर्मिळ झालेले आहे. त्यांच्याकडून केली जाणारी विकासकामे ही सेवा राहिली नसून अनैतिक मार्गाने भरघोस मेवा खाण्याची माध्यमे झालेली आहेत. दुर्दैवाने सर्वच गोष्टींचे पुरावे देता येतील अशी सक्षम व्यवस्था आपल्या देशात अजून विकसित झालेली नाही. त्याचाच हा गैरफायदा आहे.
❖ आ.माणिकराव कोकाटे प्रकरण : केवळ एक व्यक्ती?
आ.माणिकराव कोकाटे प्रकरणात न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निर्णय दिला आहे. न्यायालयाचा अधिकार हा पुराव्यांपुरताच मर्यादित असतो.
मात्र खरा प्रश्न असा आहे की – जर एखाद्या लाभार्थ्याने खोटी कागदपत्रे सादर केली असतील, तर ती खोटे कागदपत्र देणारी, स्वीकारणारी आणि तपास न करणारी यंत्रणा निर्दोष कशी?
हा प्रश्न व्यक्तीएवढेच व्यवस्थेवर बोट ठेवतो.
❖ गरीब योजना : खऱ्या गरिबासाठी की सक्षमांसाठी?
EWS / LIG सारख्या योजना खऱ्या गरिबांसाठी तयार केल्या जातात. परंतु वास्तवात अनेकदा असे दिसते की –
- ज्याच्याकडे कागदपत्रे आहेत, तो पात्र ठरतो
- ज्याच्याकडे शिफारस आहे, तो पुढे जातो
- आणि ज्याला गरज आहे, तो मागे राहतो
खऱ्या गरिबाला अर्ज प्रक्रिया समजत नाही, कार्यालयीन फेऱ्या परवडत नाहीत आणि कायदेशीर लढाई झेपत नाही.
म्हणूनच प्रश्न उभा राहतो — योजना गरीबांसाठी असतात, मग लाभ गरिबालाच का मिळत नाही?
❖ दोष लाभार्थ्याचा, पण अधिकारी निर्दोष?
कोणतीही योजना मंजूर होताना फाईल्स फिरतात, दाखले तपासले जातात, सह्या होतात.
जर दाखले खोटे असतील तर —
- ते दिले कसे गेले? स्वीकारले कसे गेले?
- तपास का झाला नाही?
- जबाबदारी निश्चित का झाली नाही?
पण वास्तव असे आहे की, बहुतेक प्रकरणांत फक्त लाभार्थी आरोपी ठरतो, यंत्रणा मात्र सुरक्षित राहते आणि त्यातूनच खोटे कागदपत्र देण्याची हिंमत यंत्रणेत तयार होते.
हा न्याय नाही, तर निवडक कारवाई आहे.
❖ सत्यासाठी की राजकीय अडवणुकीसाठी?
या प्रकरणात तक्रारदाराच्या हेतूवरही प्रश्न उपस्थित होतात. तक्रार सत्यासाठी होती की राजकीय विरोधातून, हा मुद्दा सार्वजनिक चर्चेत येतो. कारण त्या काळात सदनिका ज्या अन्य लाभार्थ्यांना देण्यात आल्या ते अन्य लाभार्थीदेखील खरोखर गरीब होते का?
कायद्याच्या दृष्टीने मात्र एकच गोष्ट महत्त्वाची असते — पुरावे.
पुरावे मजबूत असतील तर तक्रारदाराचे हेतू गौण ठरतात.
❖ पुराव्यांचा अभाव : व्यवस्थेचा मोठा दोष
भारतात व्यवहार तोंडी होतात, आर्थिक व्यवहार रोखीत होतात आणि फाईल्स कालांतराने हरवतात.
परिणामी,
- सत्य सर्वांना माहीत असतं
- पण न्यायालयात सिद्ध होत नाही
याच पोकळीचा फायदा घेऊन निवडक न्याय कार्यरत राहतो.
❖ दोष व्यक्तीचा की व्यवस्थेचा?
हा प्रश्न केवळ आ.माणिकराव कोकाटे प्रकरणापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न संपूर्ण राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेचा आहे.
जर कायदा निर्भीडपणे आणि समानपणे लागू झाला, तर अनेक चेहरे अडचणीत येतील. म्हणूनच कायदा निवडकपणे लागू केला जातो.
घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की सामाजिक आणि आर्थिक न्यायाशिवाय राजकीय लोकशाही अर्थहीन ठरते.
❖ निष्कर्ष : खरा आरोपी कोण?
या प्रकरणातून एकच निष्कर्ष स्पष्ट होतो —
- दोष केवळ व्यक्तीचा नाही
- दोष संपूर्ण व्यवस्थेचा आहे
- शिक्षा मात्र निवडक लोकांनाच होते
बऱ्याचदा पुराव्याअभावी सत्य देखील असत्य ठरते आणि बऱ्याचदा बनावट पुराव्यांच्या आधारे असत्य देखील सत्य ठरते हे देखील एक सत्यच आहे.
म्हणूनच प्रश्न असा असायला हवा —
कोण अडकलं? या सोबतच
कोण वाचलं आणि का?
हा प्रश्न विचारणं म्हणजे राजकारणाचा विरोध नाही, तर लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे.
भ्रष्टाचाराच्या सिद्धतेसाठी उभी हयात वाया घालवून बऱ्याचदा डोंगर पोखरून उंदीर काढण्यापेक्षा भ्रष्टाचारच करता येणार नाही अशा प्रकारची सक्षम आणि आदर्श व्यवस्था भारतात विकसित होणे काळाची गरज आहे.
— श्रमिक क्रांती : गरीबांचा आवाज
अगदी बरोबर सरकार ने व जनतेने आपले म्हणणे.समजून घेऊन कार्यवाही केली पाहिजे.
ReplyDeleteसगळे राजकारणी एकाच माळेचे मणी! डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, अरविंद घोष,.. असे सगळे अनगिनतत महान थोर नेत्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून नविन विचार दिला पण जनतेने त्याचा वेगळा अर्थ काढला..
ReplyDelete