गरीबी ही अपयश नाही, ती व्यवस्थेचा गुन्हा आहे

Shramik Kranti – Garibon Ka Aawaz

कर्तृत्व पैशात मोजायचे की कामाच्या उपयुक्ततेत?

पैसा≠कर्तृत्व; उपयुक्तता=कर्तृत्व

आजच्या समाजात एक अतिशय धोकादायक आणि भ्रामक समज दृढ झाला आहे — ज्याच्याकडे जास्त पैसा, तोच जास्त कर्तृत्ववान.

पण खरोखरच हे सत्य आहे का? की ही केवळ व्यवस्थेने आपल्या मनावर बिंबवलेली एक सोयीस्कर कल्पना आहे?


पैसा मिळतो म्हणून क्षेत्र उपयुक्त ठरते का?

व्यापार, उद्योग, करमणूक, क्रीडा या क्षेत्रांमध्ये काही व्यक्तींनी प्रचंड संपत्ती मिळवली. त्यामुळे त्या व्यक्तींना अत्यंत कर्तृत्ववान ठरवले गेले.

उदाहरणार्थ मुकेश अंबानी किंवा गौतम अदानी.

पण एक मूलभूत प्रश्न विचारायलाच हवा —

हेच लोक जर शेती किंवा ग्रामीण उत्पादन क्षेत्रात कार्यरत असते, तर ते इतकी संपत्ती कमवू शकले असते का?

उत्तर स्पष्ट आहे — नाही. कारण इथे कर्तृत्वापेक्षा क्षेत्र आणि व्यवस्था निर्णायक ठरते.


श्रीमंती कर्तृत्वातून येते की व्यवस्थेतून?

पैसा मिळण्यामागे तीन गोष्टी निर्णायक असतात: 1.क्षेत्र (Sector) 2.व्यवस्था (Policy / Market / State Support) 3.हमी व संरक्षण (Guarantee & Risk Cover) उद्योगपती श्रीमंत होतात कारण —

  • त्यांच्या मालाला हमी खरेदी मिळते
  • करसवलती व अनुदाने मिळतात
  • कर्ज, विमा आणि कायदेशीर संरक्षण असते
  • तोट्याचा धोका व्यवस्थेने कमी केलेला असतो

मग प्रश्न उरतो —

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला, श्रमिकांच्या श्रमाला योग्य दाम मिळाला, तर ते श्रीमंत होणार नाहीत का?

उत्तर एकच आहे — होणार नाहीत असे नाही, होऊ दिले जात नाही.


खर्‍या अर्थाने समाजासाठी उपयुक्त कोण?

समाज चालतो कशावर?

  • अन्न — शेतकरी
  • निवारा — बांधकाम कामगार
  • पाणी, वीज, रस्ते — श्रमिक

या शिवाय समाज टिकू शकत नाही.

मात्र क्रिकेटपटू, अभिनेता, सेलिब्रिटी — हे क्षेत्र समाजाला आनंद देतात, पण ती मूलभूत गरज नाही.

तरीही पैसा कुठे? मूलभूत गरज-पुर्ती करणाऱ्यांकडे नाही, तर करमणूक करणाऱ्यांकडे आणि अन्न उत्पादकाला मात्र कर्जबाजारीपणा, आत्महत्या, अपमान. ही विसंगती कर्तृत्वाची नाही, मूल्यव्यवस्थेची आहे.


कर्तृत्व मोजायचे कसे?

कर्तृत्व मोजण्याचा निकष चुकीचा आहे

आज आपण विचारतो —

“तो किती कमावतो?”

खरा प्रश्न असा असायला हवा —

“तो समाजासाठी किती आवश्यक आहे?”

जर उपयुक्तता हा निकष लावला, तर शेतकरी, श्रमिक, सफाई कामगार, परिचारिका यांसह अन्य कष्टकरी हे समाजातील सर्वात कर्तृत्ववान घटक ठरतील.

पैसा-प्रतिष्ठाप्रधान व्यवस्थेचे नैतिक अपयश

समाजविघातक आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या आर्थिक क्रियांमध्येही भरमसाठ पैसा मिळतो, हे वास्तव व्यवस्थेतील गंभीर दोष दाखवते.

जी व्यवस्था समाजासाठी घातक असलेल्या क्रियांना प्रचंड आर्थिक लाभ देते आणि समाजासाठी आवश्यक श्रमांना उपेक्षित ठेवते, ती व्यवस्था नैतिकदृष्ट्या अपयशी ठरते.


आजच्या समाजात एक खोटा पण प्रचलित तर्क रूढ झालेला आहे:

श्रीमंती = यश

यश = बुद्धिमत्ता

बुद्धिमत्ता = नेतृत्व

हा तर्क चुकीचा असूनही सामाजिक व्यवहारात तोच स्वीकारला जातो.


याच तर्कामुळे:

  • गुन्हेगारीतून पैसा कमावलेली व्यक्तीही
  • “यशस्वी”, “चाणाक्ष”, “पॉवरफुल” ठरते
  • समाज त्याला प्रश्न विचारण्याऐवजी नतमस्तक होतो
प्रतिष्ठा चारित्र्यातून नव्हे, खात्यातून मिळते.

आज पैसा ही केवळ आर्थिक शक्ती राहिलेली नाही, तर ती सामाजिक प्रतिष्ठेचे आणि राजकीय प्रभावाचे प्रमुख साधन बनली आहे.

त्यामुळे समाजविघातक किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या आर्थिक क्रियांमधून पैसा मिळवणाऱ्यांनाही सामाजिक मान्यता आणि राजकीय संरक्षण मिळते.

हा दोष व्यक्तींचा नसून, पैशालाच प्रतिष्ठेचा निकष मानणाऱ्या व्यवस्थेचा आहे.

ज्या व्यवस्थेत उपयुक्त श्रमाला प्रतिष्ठा नाही आणि नफ्याला नैतिकतेपेक्षा अधिक महत्त्व आहे, तिथे लोकशाहीही आर्थिक सत्तेची गुलाम बनते.


गरीबी ही अपयश नाही, ती व्यवस्थेचा गुन्हा आहे

गरीबी ही —

  • आळशीपणाचा परिणाम नाही
  • कर्तृत्वाच्या कमतरतेचा परिणाम नाही

गरीबी ही अन्यायकारक आर्थिक व सामाजिक व्यवस्थेची निर्मिती आहे.

म्हणूनच श्रीमंती वा गरीबी ही व्यक्तीच्या गुणवत्तेशी नव्हे, तर व्यवस्थेशी संबंधित असते.


पैसा कर्तृत्वात मोजणारी व्यवस्था हवी

आजची व्यवस्था म्हणते —

जिथे पैसा, तिथे प्रतिष्ठा.

पण उद्याची व्यवस्था अशी असली पाहिजे —

जिथे उपयुक्तता, तिथे पैसा.

कर्तृत्व पैशात मोजण्याऐवजी पैसा कर्तृत्वात मोजला गेला पाहिजे.

हीच खरी गरीबी निर्मूलनाची दिशा, सामाजिक न्यायाची वाट आणि श्रमिक क्रांतीचा वैचारिक पाया आहे.


–लेखक अरुण रामचंद्र पांगारकर प्रणेता, श्रमिक क्रांती | गरीबांचा आवाज

Comments

Popular posts from this blog

भारत हा लुटारूंचा देश बनत चालला आहे....?

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

लोकशाहीचे अपयश की नागरिकांची उदासीनता?